... जी. एं. च्या कथाविश्र्वातील प्रत्येक व्यक्ती कुणाशी तरी नाते जुळविण्याची धडपड करीत असते. परस्परांना जोडणारा कोणता तरी आतड्यांचा धागा ती शोधीत असते. निराकार, अस्ताव्यस्त पसार्यातून येणारी एक हतबलतेची जाणीव त्यांना पछाडून टाकते. त्यांच्या कथांमधल्या व्यक्ती शरीराने किंवा मनाने अधू आहेत, काही अशा झपाटलेल्या आहेत की त्याचे रूपांतर वेडात कधी होईल हे सांगता येऊ नये. योजनारहित जीवनातली सर्वंकष सूत्रहीनता आणि विलगता हे एक टोक, तर या तुटलेपणाच्या सीमेवरच उफराट्या स्वरूपात जाणवणारी अंतर्व्यवस्था आणि सूत्रबध्दता हे दुसरे टोक. या दोन टोकांमध्ये विलगतेच्या ज्या अनेक पातळ्या आहेत त्यांचे रूप जी. ए. बारकाईने न्याहाळून पाहत आहेत. एका टोकाला अधू, विस्कळीत, विकृत माणसांचे जग आणि दुसर्या टोकाला तो कालपुरुष! या दोन विरोधी टोकांना जोडणार्या आणि ताणलेल्या रेषेवरच तोल सावरीत माणसाची जगण्याची कसरत सुरू राहते. अनुभवाच्या बहुविध थरांचे दर्शन इथे घडते. हे जग कमालीचे संपन्न, जिवंत आणि उत्कट आहे. असे विलक्षण जग मराठी वाङ्मयामध्ये व्कचित दृष्टीला पडले आहे. - म, द. हातकणंगलेकर
please login to review product
no review added