जगातल्या प्रत्येक धर्माचा दावा असतो – ‘माणसाचं आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नयन हेच आमचं उद्दिष्ट!’ मात्र आज ‘धर्म’ या शब्दानं अत्यंत शक्तिशाली अशा स्फोटकाची जागा घेतली आहे. हिंदू, मुसलमान, ज्यू, खिश्चन… हे शब्दोच्चारही परस्परांच्या मनात दहशत निर्माण करत आहेत. कल्याणकारी रूप अपेक्षित असलेल्या धर्माशी जोडल्या गेलेल्या या भयभावनेचा उगम नेमका कुठे आहे? धर्माच्या नावाखाली चाललाय उद्विग्न करणारा उच्छाद. घरापासून रस्त्यापर्यंत चाललेल्या हिंसेला जबाबदार ठरतोय धर्म. गलिच्छ राजकारणासाठी, सत्ताप्राप्तीसाठी, स्त्रीच्या उपभोगासाठी, दलितांच्या खच्चीकरणासाठी, दुर्बलांच्या पिळवणुकीसाठी तो बिनदिक्कतपणे वापरला जावा? आणि आपण फक्त हतबलतेनं बघत राहावं? धर्म अशी राखरांगोळी करून टाकतो माणसाची? धर्मशास्त्रातली वचनं म्हणजे शेवटी माणसानंच बनवलेली विधिनिषेधांची नियमावली! ती काही काळ्या दगडावरची रेघ नव्हे, की जी पुसताच येत नाही. आणि जर ती काळ्या दगडावरची रेघ असेल, तर असा दगडच नाकारण्याची तयारी ठेवायला हवी. माणसाचं माणूसपण आणि त्याच्या जीवनातील धर्माचं स्थान याचा मुळापासून वेध घेणारा ग्रंथ.
please login to review product
no review added